रत्नागिरी : सातत्याने वीजबिल भरण्याचे आवाहन करूनही ग्राहकांनी महावितरण कंपनीला ठेंगा दाखविला आहे. कोकण मंडळातील दोन जिल्ह्यांत पावणेदोन लाखाहून अधिक ग्राहकांकडे ७३.५७ कोटीची लाखाची थकबाकी आहे. बिलांची थकबाकी कशी संपवायची, याच विचाराने अधिकारी हवालदिल झाले आहेत.
गेल्या वर्षी २२ मार्चपासून करोनाचे संकट सुरू झाले. संचारबंदीमुळे सर्वांचेच स्वतःच्या घरातच राहण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र या काळात वीजपुरवठा सुरू राहिला. घरी राहणाऱ्या मंडळींना अगदी करोनाबाधित झालेल्या परिसरातही जिवाची बाजी लावत कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना अविरत वीजृपुरवठा सुरू ठेवला. करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर महावितरण कंपनीने वीज बिले देण्याची सुरवात केली. परंतु वीजृग्राहकांच्या अडचणीचा विचार करून आणि वीज वापर बराच वाढल्याने वीजपुरवठा खंडित न करता हप्त्याने बिल भरण्याची सवलत देण्याचा निर्णय शासनाने आणि महावितरण कंपनीने घेतला. गेल्या सप्टेंबरपासून सर्व
वीजग्राहकांना हप्ते पद्धतीने वीज बिल भरणा करण्याची विनंती केली होती. मात्र ग्राहकांनी हप्त्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने थकबाकी सातत्याने वाढत राहिली.
वाढत्या थकबाकीमुळे एकही हप्ता न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय गेल्या १० मार्चपासून ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केला. त्यामुळे केवळ २० दिवसांत पूर्ण थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महावितरण कंपनीसमोर होते. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर काही ठिकाणी हल्लेदेखील झाले. मात्र कर्मचाऱ्यांच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे थकबाकी वसूल होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. काल ३१ मार्चअखेर वीजग्राहकांनी महावितरणला ठेंगा दाखवल्याचे दिसत आहे. दोन्ही जिल्ह्यांत मिळून एक लाख ७९ हजार ८९७ ग्राहकांकडे ७३ कोटी ५७ लाखाची थकबाकी आहे. आर्थिक वर्ष संपले, तरीही थकबाकी वसूल झाली नसल्याने आता कोणती कारवाई होणार, याची चिंता कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे. पूर्ण थकबाकी वसूल होईपर्यंत आता ही मोहीम थांबवायची नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनीही केला आहे.
थकबाकीवर एक नजर
रत्नागिरी जिल्हा –
थकबाकीदार – ९५ हजार ८२८, थकबाकीची रक्कम ३४ कोटी ६६ लाख
सिंधुदुर्ग जिल्हा –
थकबाकीदार – ८४ हजार ६९, थकबाकीची रक्कम – ३८ कोटी ९१ लाख

