रत्नागिरी : रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (११ जानेवारी २०२२) गोव्यात निधन झाले. निवृत्तीनंतर ते राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक अनुसंधान कार्याशी, तसेच महाविद्यालयांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅक’ या संस्थेच्या कार्याशी संबंधित होते. देव सर या नावाने ते रत्नागिरीसह राज्यात व राज्याबाहेरही प्रसिद्ध होते. १२ जानेवारी रोजी त्यांच्यावर रत्नागिरीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
१ जानेवारी १९५५ ही त्यांची जन्मतारीख. अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या देव सरांनी सुरुवातीला काही काळ ग्रंथालयात रेफरी म्हणून सेवा केली. या पदाची जबाबदारी सांभाळताना विद्यार्थी व अध्यापकांना योग्य आणि उत्कृष्ट पुस्तके सुचविण्यातून त्यांच्या स्वतःच्या मनात ग्रंथालयाच्या विकासाबाबत कल्पना तयार झाल्या. प्राचार्यपदाच्या काळात त्यांनी त्या यशस्वीपणे राबविल्या. एक लाखाहून अधिक ग्रंथसंपदा असणाऱ्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बाबूराव जोशी ग्रंथालयात कोणत्याही विषयावरील पुस्तके ते चटकन सुचवू शकत असत.
अध्यापकीय काळात त्यांनी अर्थशास्त्राशी संबंधित विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले होते. याबरोबरच अन्य विषयांचा त्यांचा अभ्यासही नवल वाटण्याइतका सूक्ष्म असे. विशेष म्हणजे महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांबाबत त्यांची अत्यंत समतोल वागणूक असे. सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांशी आपुलकीने वागणारे देव सर अत्यंत वक्तशीर होते. कोणत्याही कार्यक्रमाला दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
प्राचार्य असताना त्यांनी राबविलेल्या अनेक योजना आणि विद्यार्थfभिमुखता यामुळे महाविद्यालयाचा चेहरामोहरा बदलून गेला होता. विविध विषयांची आणि प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती यामुळे त्यांच्या प्राचार्यपदाच्या काळात महाविद्यालयाचा दर्जा उंचावला. कोकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘कोकण टॅलेंट सर्च’ (केटीएस) या परीक्षेमागे त्यांची भूमिका मध्यवर्ती होती.
महाविद्यालयात ‘विज्ञान मंच’सारख्या योजना राबवून त्यांनी जिल्ह्यातील बुद्धिमान आणि होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची अधिकाधिक ओळख होण्यासाठी प्रयत्न केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत विविध नामवंत संशोधन संस्थांच्या साह्याने उत्तमोत्तम प्रयोगसाहित्य आणि उपकरणे मिळविण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र होते. त्यांच्या कारकिर्दीत ‘एनएसएस’ची दोन महाशिबिरे महाविद्यालयात झाली होती. विविध विषयांवरील राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय परिसंवाद व चर्चासत्रे यांचे आयोजन, ग्रंथालयाच्या विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनुकूलता यामुळे त्यांच्या कारकिर्दीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा चहूबाजूंनी विकास झाला. महाविद्यालयाच्या परिसराचे सुशोभीकरण आणि इमारतींचा विस्तार यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उत्तमोत्तम पुस्तके यावीत यावर डॉ. देव यांचा कटाक्ष असे. महाविद्यालयात लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मार्गदर्शनाचे वर्गही त्यांनी सुरू केले होते.
निवृत्तीनंतर रत्नागिरी शहरातील भारत शिक्षण मंडळाच्या नवीन महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यासाठी देणगीही दिली होती. त्यांच्या अकस्मात निधनाने रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
(रत्नागिरीतील वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांचे गेल्या वर्षी निधन झाले. तेव्हा कोकण मीडियाने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकात डॉ. सुभाष देव यांनीही त्यांच्यावर लेख लिहिला होता. तो लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)