रत्नागिरी : कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे गुरुवारपासून (दि. ५ ऑक्टोबर) बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
वानर-माकडांच्या समस्येकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. वानरांचा बंदोबस्त व्हावा व भयमुक्त शेती करता यावी, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. सरकारने वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून न्याय द्यावा, ही अपेक्षा श्री. काळे यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी काळे यांनी या मागणीसाठी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळाला होता. कोकणातून सर्व जिल्ह्यांतून शेतकऱ्यांनी पाठबळ दिले होते. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक सभा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात घेण्यात आली होती. त्यालाही शेतकऱ्यांची चांगली उपस्थिती होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन, वन विभाग यांना प्रत्येक शेतकऱ्याने निवेदन दिले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, परिक्षेत्र वनाधिकारी या सर्वांना वानरांच्या बंदोबस्तासंदर्भात निवेदन पाठवण्यात आली; मात्र अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे काळे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वानर, माकडांच्या प्रचंड उपद्रवामुळे शेतकरी, बागायतदार आणि नागरिक मेटाकुटीला आले आहेत. कोकणातील माणूस अजूनपर्यंत आत्महत्या करत नव्हता; पण आता वानरांमुळे शेतकऱ्यांवर ती वेळ येऊ शकते. वानर, माकडे घरावरील नळे, पत्रे फोडतात, पाइप तोडतात, घरात शिरून नासधूस करतात. माणसांच्या अंगावरही धावून येतात. हे प्रकार वाढले आहेत. गेल्या साधारणपणे ३५ वर्षांत वानर, माकडे मारणे बंद झाले. त्यामुळे त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आज ही जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे.
कृषी विभागाच्या योजना वानर, माकडांसाठी राबवायच्या का, असा सवाल श्री. काळे यांनी केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये काळे यांनी समाजमाध्यमावर लेख लिहिला होता. त्यानंतर सुमारे ७०० शेतकऱ्यांना त्यांना फोन केला. प्रत्येक शेतकरी माकडांच्या त्रासामुळे हैराण झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले.
वन खात्याची १९२६ ही हेल्पलाइन आहे. त्यावरही शेकडो फोन करूनही प्राणी न्यायला कोणी आले नाही. वानरांचा कायमचा बंदोबस्त व्हावा. तात्पुरता उपाय म्हणून त्यांना पकडून अभयारण्यात सोडावे. आम्हाला आमची शेतीबागायती भयमुक्त करू दे. आमचा तो हक्क आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. कोकणातील गावेच्या गावे ओस पडली तर पुढच्या पिढ्या कधीच माफ करणार नाहीत, असा इशारा काळे यांनी दिला आहे.
लोककलाकार सचिन काळे यांनी एका कार्यक्रमात मांडलेली वानर-माकडांच्या उपद्रवाची कथा
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

