रत्नागिरी : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि कोकण जोडणारी मध्य रेल्वेची विशेष गाडी येत्या ९ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहे. नागपूर ते मडगाव या मार्गावर ही गाडी धावणार आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावरून येत्या ९ एप्रिल रोजी (शनिवार) ०१२०१ क्रमांकाची गाडी दुपारी १५.५० वाजता सुटेल. दुसर्या दिवशी मडगाव येथे सायंकाळी १७.३० पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता ०१२०२ क्रमांकाची विशेष गाडी १० एप्रिल रोजी मडगाव स्थानकावरून रात्री २०.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री २०.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी, थिवी या स्थानकांवर थांबेल. गाडीला द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी वातानुकूलित, शयनयान डबे असतील. गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. ही गाडी ९ एप्रिल ते १२ जून या काळात धावणार आहे.
ही गाडी कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेचे रत्नागिरी आणि रायगड जिल्हाध्यक्ष वैभव बहुतुले यांनी सातत्याने केली होती. तूर्त हंगामी स्वरूपात गाडी धावणार असली, तरी ती कामस्वरूपी धावण्यासाठी यापुढेही सातत्याने मागणी केली जाणार आहे.
Follow Kokan Media on Social Media

