आंबा घाटात दरडीमुळे ठप्प झालेली वाहतूक सुरू; खेड-दापोली मार्ग बंद; संगमेश्वरमध्ये वीज नाहीच

रत्नागिरी : हवामान विभागाने आज (१८ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अ‍ॅलर्ट दिला असून, पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर संगमेश्वर तालुक्यात दख्खनजवळ दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. महामार्गाचे काम करणारी ठेकेदार कंपनी, तसेच पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर काम करून वाहतूक नुकतीच पुन्हा सुरू केली आहे; दरम्यान, नारिंगी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने खेड-दापोली रस्ता बंद झाला आहे. संगमेश्वर तालुक्यात आरवली ते संगमेश्वर ३३ केव्ही वीजवाहिनी नादुरुस्त झाल्याने काल (१७ ऑगस्ट) रात्रीपासून खंडित झालेला वीजपुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. दुरुस्तीचे काम सुरू असून, सायंकाळी चार वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू होण्याचा अंदाज आहे.

आज सकाळी संपलेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७० मिलिमीटर पाऊस पडला. संगमेश्वर तालुक्यात १६३.३३ मिमी, दापोलीत १५४ मिमी, चिपळूणमध्ये १४७.११, मंडणगडमध्ये १२४ मिमी, रत्नागिरीत ११९.५५ मिमी, लांज्यात ११६.६६ मिमी, गुहागरमध्ये ११३ मिमी, तर राजापुरात ९९.६२ मिमी पावसाची नोंद झाली. खेडमधली जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून, तर संगमेश्वरातली शास्त्री आणि राजापुरातली कोदवली या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply